Wednesday, 23 May 2012

बरस रे एकदा पावसा..!

उभा का असा तू शांत दूरवर,
का राग तुझा ह्या रानावर,
काय चूक अमुची कळेल का आम्हा,
नाही घडणार ती आता पुन्हा पुन्हा..!

रात्र आणि दिवस हि राबाव आम्ही,
चटणी आणि भाकरी साठी तरसतात तान्ही,
का असा आमच्यावरच राग हा तुझा,
का आमुच्या मानागुटावर पाय हा तुझा..!

राजाने नुसता हुकुम सोडवा,
गुलामाने नुसता तो झेलावा,
आम्ही कधी मेलो त्याला किंमतच नाही,
रडायला ह्या डोळ्यात आता पाणीसुद्धा नाही..!

सूर्य रोज अमुच्या वरी आग ओकणार,
रानात राबून आमच रक्त आटणार,
कस कुठ काहीतरी थोडस उगवणार,
आणि मग त्याला फक्त कवडीच मिळणार...!

आमच्या मुलांनी शाळेत जायचे नाही,
दिवाळी तर दूर कधी सुट्टी घ्यायची नाही,
त्यांनीही पोटाला उपाशी राहायचे,
त्यांनीही रडत रडत दिवस काढायचे..!

मर्जी नक्की तुझी काय हे तरी सांग,
दिलेल्या बळींना एकदा तरी जाग,
अजून किती शेतकऱ्याचे तू हाल करणार,
केलेली पाप तू तरी कुठ फेडणार..!

कधी तरी आमची सुद्धा कीव येऊ दे,
कधी तरी आम्हा हि सुख लाभू दे,
पड कधी तरी आमच्या मनासारखा,
रानालाही भेटू दे त्याचा जिवलग सखा...!
तू जरा बरसलास तर फार बर होईल,
ह्या वर्षी तरी शेतकरी तूप पोळी खाईल,
त्यांच्याही जीवाला शांत होऊ दे,
तुलाही थोडफार पुण्य मिळू दे..!

3 comments:

  1. अत्यंत सुंदर कविता!! असाच लिहित राहा!! Awesome!!

    ReplyDelete